9 July Bitambatmi All pages

Open Book

 प्रशासन, पोलिस व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून नागरिकांना दिलासा
डोंबिवली,  ७ जुलै (आरती परब): आज मोठागाव रेल्वे फाटकावर एका मालवाहू रेल्वेगाडीचे इंजिन अचानक बंद पडल्याने रेल्वे फाटकामध्येच गाडी थांबली. परिणामी मोठागाव, कोपर रोड तसेच परिसरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा नगरसेवक स्थायी समिती सदस्य दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेत आपल्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवून वाहतूक नियंत्रणासाठी मदतकार्य सुरू केले. तसेच वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. वाहतूक कोंडीची तीव्रता लक्षात घेऊन कोपर रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची व्यवस्था करण्यात आली.
यासोबतच दिपेश म्हात्रे यांनी संबंधित रेल्वे व DFCCIL अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पर्यायी इंजिन पाठविण्याची मागणी केली. त्यानुसार काही वेळातच दुसरे इंजिन घटनास्थळी दाखल झाले आणि बंद पडलेली मालवाहू रेल्वेगाडी रेल्वे फाटकावरून हलविण्यात आली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात यश आले.
यावेळी दिपेश म्हात्रे यांनी संयम राखून सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणारे मोठागाव ग्रामस्थ मंडळ, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. याबाबत बोलताना दिपेश म्हात्रे म्हणाले, “नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असून अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देणे हेच आमचे कर्तव्य आहे.”
०००००

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागामार्फत राज्यभर ‘कृषी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार असून, या महोत्सवाचे सविस्तर आणि प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले.
मंत्रालयातील दालनात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषी महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्टचे संचालक एम. जे. प्रदीप चंद्रन, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प संचालक मीनल करनवार, कृषी संचालक रफीक नाईकवडी, अविनाश बोरकर, विनयकुमार अवटी, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृषीमंत्री भरणे म्हणाले की, यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत असून, महिला शेतकरी विधेयकही विधिमंडळात सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी महोत्सवात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देत त्यांच्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि विविध कृषीविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
ते पुढे म्हणाले की, पेरणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर आयोजित होणाऱ्या या महोत्सवात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, अत्याधुनिक कृषी अवजारे, यांत्रिकीकरण, पीक व्यवस्थापन, मूल्यवर्धन आणि कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरविण्यात यावे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळून आधुनिक शेतीचा स्वीकार करण्यास चालना मिळेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करून कृषी महोत्सव प्रभावीपणे राबविण्यात यावा, अशा सूचनाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
००००००००००००

००००००००
नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्ग निवडण्यासाठी  मार्गदर्शक असे “शिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर” शनिवार, ११ जुलै रोजी ऐरोली येथील शिवसमर्थ सहकारी पतपेढी लि. यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात दहावी व बारावीनंतर कोणता मार्ग निवडावा, आपल्या क्षमता कशा ओळखाव्यात, ॲप्टिट्यूड (Aptitude) टेस्ट म्हणजे काय, शिक्षणाचे विविध पर्याय कोणते आहेत तसेच योग्य करिअर घडवण्यासाठी कोणती तयारी आवश्यक आहे, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या शिबिरात युवकांना मिळणार आहेत.
आयपीएचचे संस्थापक स्व.डॉ. आनंद नाडकर्णी यांचे सहकारी तथा ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ   अरुण नाईक यांचे मौलिक मार्गदर्शन या शिबीरात लाभणार आहे.
११ जुलैला सेक्टर ५, ऐरोली येथील जानकीबाई मढवी मंगल कार्यालयात संध्याकाळी ४ वाजता हे शिबीर संपन्न होणार असून विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घेऊन करिअरविषयक योग्य दिशा निश्चित करावी असे आवाहन शिवसमर्थ पतपेढीचे अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी ७७१५९२८८८२ / ९८३३१५०४५९ / ७३०४७११८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
००००००००

कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे दिले निर्देश
 झाडांचे शास्त्रोक्त पध्दतीने ऑडिट करा
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला भेट देवून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर आपत्तीच्या काळात कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली तर एका अधिकाऱ्याला निलंबनाची नोटीस बजावली.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मधुकर बोडके, उपनगरअभ‍ियंता शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मढवी, राजेश मोरे, विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले आदी उपस्थित होते.
ताशी ८० ते ९० पेक्षा वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार अतिवृष्टीमुळे शहरात झाडे व फांद्या पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली. या भेटीत त्यांनी  तातडीने सर्व झाडांचे शास्त्रोक्त पध्दतीने ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. संबंधित झाडांची शेवटची छाटणी (ट्रिमिंग) कधी करण्यात आली होती, झाडांची स्थिती काय होती आणि कोणत्या कारणांमुळे ती पडली याचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरात पडलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने हटविण्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या हायड्रा, लिफ्टिंग मशीन आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्याचेही निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. तसेच  मनुष्यबळ कमी पडत असल्यास तातडीने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही दिल्या.
भविष्यात झाडे पडण्याच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, या प्रक्रियेत वृक्षतज्ज्ञ, उद्यान क्षेत्रातील जाणकार, स्वयंसेवी संस्था तसेच इतर तज्ज्ञांना सहभागी करुन घ्यावे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे किंवा इतर विकासकामांमुळे झाडांच्या मुळांपर्यंत हवा व पाणी पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे झाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ती वादळी वाऱ्यात कोसळण्याची शक्यता वाढत असल्याने या बाबींचाही अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देताना आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आर्थिक तरतूद तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले. तसेच केवळ आपत्ती व्यवस्थापन विभाग नव्हे तर इतर विभागांतील अधिकाऱ्यांनाही गरजेनुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे शहरातील सखल भागात ८४ ठिकाणी पंप बसविण्यात आले असून त्या पंपांचे नियंत्रण आणि देखरेख आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सातत्याने करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता भासते त्या ठिकाणी तातडीने पंप कार्यान्वित केल्यामुळे पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
कामातील हयगय खपवून घेतली जाणार नाही
पावसाळ्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत संबंधित अधिकारी, वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल, तर निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
वृक्ष पडून जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करा
ठाणे शहरात वृक्ष अंगावर पडून जखमी झालेल्या  नागरिकांवर तातडीने उपचार होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. नागरिकांच्या जीवितास कोणतीही हानी होऊ नये, याला सर्वोच्च प्राधान्य द्या,  मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करता येते, मात्र एखादा जीव गमावल्यास त्या कुटुंबाचे होणारे दुःख भरून काढता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन ठाण्यात एकही नागरिकाचा जीव जाणार नाही याची दक्षता घ्या, असेही उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी नमूद केले.
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा धोका अद्याप कायम असल्याने महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागांनी २४ तास सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
०००००००००
Untitled-३
heading – रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करा – आदित्य ठाकरे
कल्याण : डोंबिवली येथील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली. यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास आरोग्य कर्मचाऱ्यांना देतानाच ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही आदित्य यांनी सांगितले. रमेश म्हात्रे याला केवळ अटक करून चालणार नाही तर त्याची धिंड काढली पाहिजे, त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.
यावेळी बोलतांना आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळेच रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई होत नाही, असा गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर केला.  मुख्यमंत्री रमेश म्हात्रे, यांच्यावर कारवाई करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करणार का? असा सवाल उपस्थित केला. एकीकडे ‘लाडकी बहीण’ म्हणायचे, मग तिच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित करत लाडकी बहीण की लाडका रमेश म्हात्रे? असा टोला लगावला. रमेश म्हात्रे  यांना तात्काळ अटक करून नगरसेवकपद रद्द करावे आणि भविष्यात निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

अनिल ठाणेकर
ठाणे: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाने लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान सभेत  केली.
महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा लाभला असून लोककला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून लोकप्रबोधन, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशाची जपणूक करणारे प्रभावी माध्यम आहे. या लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन विविध लोककला महोत्सव आयोजित करत असून लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदानही देत आहे.
सन २००८ पासून तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत आणि संगीतबारी या लोककलांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. आता या योजनेत नव्याने ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या लोककलांचाही समावेश करण्यात आला आहे.
झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील १३० वर्षांहून अधिक परंपरा असलेली वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्य परंपरा आहे. वहीगायन ही धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील लोकप्रिय लोककला असून, नमन खेळे आणि जाखडी या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत.
या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे प्रत्येकी १० लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार: झाडीपट्टी – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. वहीगायन – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. नमन खेळे – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. जाखडी – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये असे स्वरूप राहणार आहे.
०००००००००

 कुंभमेळ्याच्या खोदकामांचा फटका
हरिभाऊ लाखे
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने एकाचवेळी हाती घेतलेल्या २८ प्रमुख रस्त्यांच्या कामांसह जलवाहिन्या, गॅस वाहिन्या, पावसाळी गटारे आदींसाठी करण्यात आलेल्या चौफेर खोदकामांचा फटका बुधवारी शहराला बसला. २४ तासांत १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर नाशिक जलमय झाले. अनेक प्रमुख रस्ते आणि चौक पाण्याखाली गेले, तर सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी खड्ड्यांत वाहने अडकून अपघातांची मालिका घडली. यामध्ये शालेय वाहने, महापालिकेच्या सिटीलिंक बस आणि घंटागाडीचाही समावेश होता. दुचाकीस्वारांसाठी तर या खोदकामांमधून सुरक्षितपणे मार्ग काढणे मोठे आव्हान ठरले. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांकडून सडकून टीका होत आहे.
मंगळवारी ढगफुटीचा धोका टळल्याचा दिलासा मिळत नाही तोच बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने शहराला झोडपले. मागील २४ तासांत १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते आणि निवासी भाग जलमय झाले. नंदिनी नदीवरील काही पूल पाण्याखाली गेले, तर अनेक दुकाने आणि इमारतींच्या वाहनतळांत पाणी शिरले.
नाशिकला यापूर्वीही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मात्र यावेळची परिस्थिती वेगळी होती. रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असतानाच सर्वत्र सुरू असलेल्या खोदकामांमुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते अर्धवट बुजविण्यात आले असून, काही ठिकाणी एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने धोका अधिक वाढला.
कुंभमेळ्यासाठी शासनाने सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. वेळ कमी असल्याचे कारण देत महापालिकेने रस्ते, पूल, जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या अशी अनेक कामे एकाचवेळी सुरू केली. परिणामी शहरातील अनेक रस्ते अक्षरशः मृत्यूचे सापळे बनल्याचे चित्र दिसून आले.
खोदकाम झालेल्या ठिकाणी दगड आणि मुरूम टाकून तात्पुरते समतलीकरण करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे ही मलमपट्टी वाहून गेली आणि अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले. रस्त्यांवर खडी, चिखल आणि माती पसरल्याने वाहतूक धोकादायक बनली. गंगापूर रस्त्यावर शालेय वाहने आणि सिटीलिंक बस खड्ड्यात अडकल्या. मुसळधार पावसात घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. उपमहापौर विलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधत त्यांना घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. ज्ञानेश्वरनगर येथील आव्हाड पेट्रोल पंपासमोर रस्ता खचल्याने अवजड मालवाहू ट्रक अडकला, तर रामवाडी परिसरात महापालिकेची घंटागाडी खड्ड्यात रुतली.
वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण
रस्ते जलमय आणि खड्डेमय झाल्यामुळे शहरभर वाहतूक कोंडी झाली. ज्या भागांत कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. खोदकामांमुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळला. तात्पुरते बुजवलेले भाग पाण्याखाली गेल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. परिणामी अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात घडले, तर चारचाकी आणि दुचाकी वाहने पाण्यात बंद पडली. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहराच्या कानाकोपऱ्यात बसल्याने पावसाळ्यात निर्माण झालेल्या या संकटासाठी महापालिकाच जबाबदार असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 अजमल हकीम रूग्णालयात व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र सुरू
सर्वांच्याच प्रयत्नाने मुंब्र्यातील व्यसनाधिनता दूर होणार – मर्झिया शानू पठाण
ठाणे -गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा आणि परिसरातील अंमली पदार्थ विक्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर  नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकाराने अजमल हकीम रूग्णालयात व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मर्जिया पठाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या केंद्राचा उद्घाटन करण्यात आले.
मर्जिया शानू पठाण यांनी काही दिवसांपासून ड्रग्स फ्री मुंब्र्याचा नारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरूणाईला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञडॉ. माचिसवाला हे सदरचे केंद्र चालविणार आहेत. या केंद्रात व्यसनाधीन तरूणांवर उपचार तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
या केंद्राचे उद्घाटनडॉ. माचिसवाला यांच्या हस्ते तसेच विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शमीम खान, नगरसेवक यासीन कुरेशी, नगरसेविका मर्जिया पठाण, शाकीर  शेख, सीमा दाते, एमआयएम नगरसेवक अन्सारी आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील,डॉ. माळगावकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी मर्झिया शानू पठाण यांनी, ही समस्या अतिशय गंभीर आहे. ही समस्या सोडवायची असेल तर सर्व पक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे. हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात  डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त सौरव राव,  महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि विरोधी पक्ष नेते शानू पठाण, सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्रामुळे व्यसनाधीन तरूण चांगल्या मार्गाला लागेल, असे सांगितले.

 मुणगे ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण निर्णय
अनिल ठाणेकर
ठाणे-  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गावातील शेतीजमीन, निवासी जागा आणि प्लॉट परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्ती, संस्था व कंपन्यांना विक्री करण्यास प्रतिबंध करण्याबाबत महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
२ जुलै २०२६ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेच्या ठराव क्रमांक १ (०३) नुसार, गावाची शेतीजमीन व निवासी जागा ही गावाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा मुख्य आधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात परजिल्ह्यातील आणि परराज्यातील व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी होत असून, भविष्यात या जमिनी विविध प्रकल्पांसाठी हस्तांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर गावाचे हित, पर्यावरण आणि सुरक्षितता जपण्यासाठी ग्रामसभेने निर्णय घेतला आहे की, गावातील कोणत्याही नागरिकाने आपली शेतीजमीन, निवासी जागा किंवा प्लॉट परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील व्यक्तींना विकू नये. ठरावात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, एखाद्या नागरिकाला अपवादात्मक परिस्थितीत जमीन विकण्याची आवश्यकता भासल्यास प्रथम प्राधान्य गावातील स्थानिक भूमिपुत्रांना द्यावे. तसेच जमीन विक्रीसंदर्भातील माहिती ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा ठराव विशेष ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी सर्वानुमते मंजूर केला. ठरावाचे सूचक योगेश प्रकाश सावंत तर अनुमोदक सुनील तुकाराम सावंत होते. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक भूमिपुत्रांचे हित, शेती आणि गावाची जमीन बाहेरील व्यक्तींच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, अशा प्रकारच्या ठरावाची कायदेशीर वैधता आणि तो विद्यमान जमीन हस्तांतरणाच्या कायद्यांशी कितपत सुसंगत आहे, याबाबत अंतिम निर्णय संबंधित कायदे व सक्षम शासकीय प्राधिकरणांवर अवलंबून राहणार आहे.
00000000

ठाणे : सततच्या पावसामुळे ठाण्यातील ऐतिहासिक मासुंदा (तलावपाळी) तलाव भरून ओसंडून वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मराज्य पक्षाने ठाणे महापालिकेवर (ठामपा) गंभीर आरोप केले आहेत. तलावाचे अधिकृत क्षेत्रफळ महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाणीवपूर्वक नमूद करण्यात आले नसल्याचा आरोप करत, तलावाच्या मूळ क्षेत्रफळाची आणि सध्याच्या प्रत्यक्ष क्षेत्रफळाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ३० मार्च २०२६ रोजी त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले होते. त्यासोबत महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाचा स्क्रीनशॉट जोडण्यात आला होता. सर्व तलावांचे क्षेत्रफळ चौरस फूटांमध्ये स्पष्टपणे नमूद करावे, अशी मागणी त्यात करण्यात आली होती.
देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, ठाणे गॅझेटमध्ये नमूद असलेल्या मासुंदा तलावाच्या मूळ क्षेत्रफळाच्या तुलनेत सध्या तलावाचे अस्तित्व केवळ सुमारे सात टक्के उरल्याचा त्यांचा दावा आहे. या दाव्याची अधिकृत पडताळणी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
धर्मराज्य पक्षाचा आरोप आहे की, अनेक वर्षांमध्ये तलाव परिसरात विविध प्रकारची बांधकामे आणि अतिक्रमणे झाली. त्यामध्ये बेकायदेशीर अतिक्रमणे, सार्वजनिक मुताऱ्या, रस्ते, सॅटीस पुलासाठी वापरण्यात आलेली जागा, पदपथासाठी घेतलेला भाग, सौंदर्यीकरणाच्या नावाखाली उभारलेली संरचना, बाजारपेठ तसेच शिवाजी मैदान परिसरातील विविध प्रकल्पांमुळे तलावाचे नैसर्गिक क्षेत्र सतत कमी होत गेले.याच कारणामुळे अल्पकालीन किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसातही मासुंदा तलाव लवकर भरून ओसंडतो आणि परिसरात पाणी साचून नागरिकांना तसेच करदात्यांना आर्थिक व सामाजिक नुकसान सहन करावे लागते, असा आरोप पक्षाने केला आहे.
देशपांडे यांनी पुढे म्हटले की, तलावाच्या मूळ आणि सध्याच्या क्षेत्रफळामधील फरक अधिकृतपणे जाहीर न करणे हे महानगरपालिकेच्या पारदर्शक कारभाराच्या तत्त्वाला तिलांजली देणारे आहे. त्यामुळे ठाणे गॅझेटमध्ये नमूद असलेले क्षेत्रफळ, सध्याचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ आणि कालांतराने झालेल्या बदलांचा संपूर्ण तपशील नागरिकांसमोर ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
धर्मराज्य पक्षाने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून तलावाच्या मूळ हद्दीचे संरक्षण, अतिक्रमणांचा आढावा आणि भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची मागणीही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *